विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे.
प्रयोगशाळेतील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षणानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या
एका वर्षाच्या DBRT (Diploma
in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. जी
मुले शाळेत मागे पडली किंवा बाहेर फेकली गेली अशी मुलेसुद्धा इथे छान शिकतात हे दिसत
होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये, तिथे अयशस्वी होऊच नये यासाठी आश्रमात
शिकण्याची जी पद्धत आहे, ती शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना
तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी व दहावीच्या मुलांबरोबर
विज्ञान आश्रमाने काम करायला सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षात आणखी दोन गावात
- मुखई आणि धामारी इथेही आश्रमाचे शैक्षणिक प्रयोग सुरु झाले. व त्यातून
’ग्रामीण तंत्रज्ञान’ अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची प्रायोगिक परवानगी SSC बोर्डाकडून
घेतली गेली. तेव्हा डॉ. कलबाग
स्वत: शाळेत शिकवत असत. त्यांनी गणित, शास्त्र या विषयात मुलांची समज कशी वाढते
याचा रीतसर नोंदी ठेवून ३ वर्ष अभ्यास केला.
१९९० साली SSC बोर्डाच्या समितीने या प्रयोगाचे
परीक्षण केले. तेव्हा लक्षात आले, की हा अभ्यासक्रम खरे तर सर्वांसाठीच उपयुक्त
आहे. याला ‘ग्रामीण’ भागापुरते
मर्यादित कशासाठी ठेवायचे? त्यामुळे ’ग्रामीण तंत्रज्ञानाचे’ नाव हे ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (Introduction to Basic
Technology (IBT)) असे बदलले गेले.